
|| श्री ||
कऱ्हाड येथे संपन्न झालेल्या प.प.सद्गुरु श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी
महोत्सवाचा आणि
प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत
‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या कऱ्हाड केंद्रात, प.प.सद्गुरु श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराजांची जयंती यानिमित्त बुधवार व गुरुवार दिनांक १५ आणि १६ जुलै २०२६ असे दोन दिवस मोठ्या हर्षोल्हासाने महोत्सव साजरा करण्यात आला. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने या संपूर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आधीच आखण्यात आली होती आणि त्याप्रमाणे नेटके पूर्वनियोजनही करण्यात आले होते. या भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आणि सद्गुरुदर्शनाच्या ओढीने पुणे, मुंबई, चिपळूण, गोवा, कोल्हापूर, लातूर, जळगांव जामोद, बेळगांव अशा विविध भागांतून साधक-भक्त कऱ्हाड येथे आले होते.
या महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या ‘श्रीसमर्थ मल्टिपर्पज हॉल’ येथे आवश्यकतेनुसार काही साधकमंडळींची राहाण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी हॉलच्या बाहेरील विस्तीर्ण पटांगणात प्रशस्त पार्किंगचीही सोय करण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मंडप उभारण्यात आला होता, तिथे रेखाटलेली सुरेख रांगोळी येणाऱ्या प्रत्येकाचे मन वेधून घेत होती. या मंडपात भाविकांच्या मार्गदर्शनासाठी स्वागतकक्ष सज्ज होता तसेच ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांचा, ‘अमृतबोध’ मासिकाचा आणि श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील विविध सेंद्रिय उत्पादनांचा असे तिन्ही स्टॉल्स अभ्यागतांना आकर्षित करीत होते. याशिवाय सभागृहात ठिकठिकाणी ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या नूतन व पुनर्मुद्रित ग्रंथसंपदेची थोडक्यात माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
व्यासपीठावर सकलऐश्वर्यमंडित श्रीदत्तपरंपरा, प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांच्या नित्यमंगल प्रतिमा स्थापित करण्यात आल्या होत्या. या देखण्या प्रतिमांना अर्पण केलेल्या कोमल, सुवासिक फुलांच्या माळा आणि मनमोहक पुष्पसजावटीमुळे संपूर्ण सभागृहात एक अलौकिक प्रसन्नता आणि मांगल्य भरून राहिले होते.
संक्षिप्त चलतचित्र
दुपारी ३.४० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांचे कार्यक्रमस्थळी परममंगल आगमन झाले. त्यानंतर लगेचच सामुदायिक-साधनेने महोत्सवास प्रारंभ झाला. साधनेनंतर चहापान व अल्पविश्रांतीसाठी वेळ ठेवण्यात आला होता. त्याच दरम्यान प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा यांचेही कार्यक्रमस्थळी परममंगल आगमन झाले.
सायंकाळी ठीक ५.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेस प्रारंभ झाला.
प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सुरुवातीलाच असे नमूद केले की, ‘‘प्रवचन-सेवेसाठी घेतलेली श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकावरील ही ओवी खरे तर सद्गुरु श्री माउलींचा एक अत्यंत सुरेख असा दृष्टांत आहे. प.पू.श्री.मामा हिला ‘सिद्धांत सांगणारी ओवी’ असे म्हणत असत. अठरावा अध्याय हा कर्मयोग व ज्ञानयोग सारांश रूपाने सांगणारा आहे !’’ पुढे त्यांनी या ओवीतील दृष्टांत काय आहे, यात समाविष्ट असेलेले हेतू कोणते व त्यामागील कारणे कोणती यांचे विस्तृत विवेचन केले.
कर्माची कारणे म्हणजे त्याचे प्रमुख घटक होत. ‘अधिष्ठान’ म्हणजेच देह, ‘कर्ता’ म्हणजे जीव, ‘इंद्रिये’, ‘प्राण’ अर्थात् क्रियाशक्ती आणि ‘इंद्रियदेवता’ या पाच कारणांनी कर्म होते. आपण निष्कारणच स्वतःला कर्ता समजून बुद्धीच्या मार्फत इंद्रियांनी भोग घेत आयुष्य व्यर्थ घालवतो आणि आपल्याठायी असणाऱ्या भगवंतांच्या अधिष्ठानाला विसरून जातो, हे भागवतातील पुरंजन राजाच्या कथेतून त्यांनी स्पष्ट करून सांगितले. तसेच जर इंद्रियदेवता बिघडल्या तर त्या मनुष्याकडून कसे विपरीत कर्म घडवून घेतात हा भाग रामायणातील कैकेयी आणि मंथरेच्या कथेतून त्यांनी स्पष्ट करून सांगितला.
‘‘देहात प्राण असेपर्यंतच तो देह कर्म करू शकतो. एकदा का त्यातील प्राण (क्रियाशक्ती) निघून गेला व देह पडला की त्याद्वारे कर्म होणार नाही. त्यामुळेच देह व प्राण हे दोन्ही कर्माचे कारण होतात. प्रस्तुत पाच कारणे व त्याबरोबर वाणी आणि मन हे कर्माच्या मागील ‘हेतु’ म्हणजे त्याचे निमित्त ठरतात !’’ सेवेसाठी घेतलेल्या ओवीतील ‘हेतू आणि त्यामागील कारणे’ यांचा विचार झाल्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी प्रवचन-सेवेचे प्रथम पुष्प श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केले.
त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी ‘शंका-समाधान सत्र’ संपन्न केले. यामध्ये साधकांनी उपस्थित केलेल्या विविध पारमार्थिक शंकांचे त्यांनी आपल्या अमृतमय वाणीने विवेचन करून समाधानकारक निरसन केले.
‘शंका’ व ‘जिज्ञासा’ यांतील भेद स्पष्ट करताना प.पू.श्री.दादा म्हणाले की, ‘‘व्यवहारातील गोष्टीसंबंधी (अविद्येसंदर्भात) असणारा प्रश्न म्हणजे शंका; तर ज्ञानाबद्दल, परब्रह्माबद्दल जाणून घेण्यासाठी केलेली पृच्छा ही जिज्ञासा आहे. शंका येणारे ते मंद साधक, तर मध्यम साधक हा जिज्ञासू वृत्तीचा असतो. ‘मी कोण आहे ?’ ‘मी कुठून आलो ?’ व ‘हे विश्व म्हणजे काय ?’ हे तीन मूलभूत प्रश्न जिज्ञासेमध्ये मोडतात. जिज्ञासेने केवळ शब्दज्ञान होईल. त्या ज्ञानाची अनुभूती मिळावी अशी इच्छा व तळमळ असणारी व्यक्ती मुमुक्षू असते आणि तीच उत्तम साधक देखील असते. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये देखील जेव्हा अर्जुनाने मुमुक्षू होऊन श्रीभगवंतांना प्रत्यक्ष अनुभवाचा मार्ग विचारला त्यानंतरच त्यांनी त्याला सहाव्या अध्यायात पुढे ‘अभ्यासयोग’ सांगितला आहे.
आपली पात्रता नसतानाही केवळ कळवळा येऊन सद्गुरूंनी आपल्यावर कृपा केली आहे, हे लक्षात ठेवून साधकांनी पापकर्म न करता शुद्ध पुण्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सद्गुरूंचा केवळ आश्रय नव्हे तर संश्रय करावा. म्हणजेच त्यांनी दिलेले साधन राखावे, त्यांना अनन्यभावे शरण होऊन सेवारत राहावे !’’ उत्तम शिष्य कसे असतात, हे पुढे त्यांनी प.प.श्री.थोरल्या स्वामी महाराजांच्या व प.पू.श्री.मामा महाराजांच्या शिष्यांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच ‘‘सर्व साधकांच्या ठिकाणी सद्गुरुकृपेचा अंश असतो; म्हणून सर्व गुरुबंधू-भगिनींशी प्रेमानेच वागावे. त्यांच्या बाह्य वर्तनाकडे लक्ष देऊ नये,’’ असेही त्यांनी नमूद केले. पुढे साधनेतील चक्रशुद्धीसंदर्भात सांगताना प.पू.श्री.दादा म्हणाले की; ‘‘साधनेसाठी एक तास हा किमान अवधी सांगितला आहे. शक्तिपाताने ऊर्ध्व झालेली शक्ती एकेका चक्राला स्पर्श करीत त्यांतील अठ्ठेचाळीस बीजाक्षरे शुद्ध करते. अशा प्रकारे सर्व वर्णमालेची शुद्धी झाल्यास त्या साधकाला मातृकासिद्धी प्राप्त होते. निरपेक्ष शरणागती व नित्य साधनारत राहिल्यास सद्गुरु त्या जीवाला भगवद्स्वरूप करूनच सोडतात !’’
‘साधनेसंबंधी सांगितलेले नियम’ याविषयीच्या शंकेचे समाधान करताना प.पू.श्री.दादा म्हणाले की, ‘‘संप्रदायाने घालून दिलेले नियम हे आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक अशा त्रिमितीवर आधारभूत आहेत. जेवढे शास्त्र पाळून साधना कराल तेवढीच ती निर्विघ्न होते. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या ग्रंथसंपदेत आधीच सविस्तर दिलेली आहेत. म्हणूनच ‘साधना पाथेय’, ‘साधना सर्वस्व’ व ‘साधना पथप्रदर्शिका’ हे ग्रंथ सर्वांनी वाचावेतच !
जगाचा उद्धार करण्याचे प्रयत्न करण्याआधी स्वतःचा उद्धार कशाने होईल व आपल्याला भगवत्प्राप्ती कशी होईल याकडे लक्ष द्यावे. सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेले साधन करीत राहिल्यास इतर कसलीच काळजी करण्याचे कारण उरत नाही !’’ असा कळकळीचा निरोप देऊन प.पू.श्री.दादांनी या शंका-समाधान सत्राचा समारोप केला.
‘शंका-समाधान सत्र’ संपन्न झाल्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा नामजप, आरती व मंत्रपुष्प संपन्न झाले. त्यानंतर रात्री ८.०० ते ९.०० या वेळेत सौ.स्मिता कुलथे यांनी श्रीसद्गुरुचरणीं गायनसेवा समर्पित केली. या गायनसेवेत त्यांनी विविध भक्तिपदे, अभंग आणि श्रेष्ठ संतांच्या रचना अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर केल्या. यामध्ये त्यांनी गायिलेल्या श्रीसंत कबीर महाराजांच्या ‘गुरुबिन कौन दिखावे बाट’ आणि श्रीसंत मीराबाईंच्या ‘मोहे लागी लगन’ या प्रसिद्ध रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘मज भेटून जा हो दत्तसख्या अवधूता’ हे आर्त पद, श्रीसंत गोरा कुंभार महाराजांचा ‘निर्गुणाचा संग’ हा अभंग, श्रीसंत जनाबाईंची ‘संत भार पंढरीत’ ही सुप्रसिद्ध रचना आणि श्रीसंत नामदेव महाराजांचा ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’ हा भक्तिरसपूर्ण अभंग सादर करत त्यांनी गायनसेवेत उत्तरोत्तर रंग भरला. अखेरीस कृतज्ञता व्यक्त करत, ‘धन्यवाद सेवा का अवसर पाया’ या पदाने त्यांनी आपल्या या बहारदार गायनसेवेची सांगता केली. या सुश्राव्य गायनसेवेला श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीची, श्री. चिन्मय देशपांडे यांनी टाळांची, श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची, तर श्री. चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची अप्रतिम साथ केली. सुरेल गायन आणि या कसलेल्या कलाकारांची अतिशय सुंदर वाद्यसाथ यामुळे हा कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. प.पू.श्री.दादांच्या हस्ते सौ.स्मिताताई व त्यांच्या साथीदारांचा प्रसादरूपी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अल्पोपाहार होऊन पहिल्या दिवशीचे कार्यक्रम समाप्त झाले.
दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या पावन उपस्थितीत ७.०० ते ८.०० या वेळेत सामुदायिक-साधनेने झाली. अल्पोपाहारानंतर सकाळी १०:०० वाजेपर्यंतच्या वेळेत उपस्थित साधकांनी ‘श्रीगुरुसाहस्री’ आणि ‘श्रीदत्ताभावांजली’ या ग्रंथांचे वैयक्तिक पारायण, वाचन केले. या दरम्यान सौ.सृष्टी व श्री.हृषीकेश टोणपे यांच्या हस्ते श्रीसत्यदत्त पूजा आणि सौ.मानसी व श्री.वरद कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुकांची पवमान अभिषेक-पूजा संपन्न झाली.
त्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या दुसऱ्या प्रवचन-सेवेस प्रारंभ झाला. प्रारंभी त्यांनी आदल्या दिवशी झालेल्या प्रवचन-सेवेचा थोडक्यात आढावा घेतला व पुढे साधनेच्या अंगाने विस्तारपूर्वक विवेचन केले.
ओवीच्या पहिल्या चरणाचे निरूपण करताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले; ‘‘ ‘अवसांत आली’ म्हणजेच ‘वसंत ऋतूमध्ये आली’. शिशिर ऋतूत पानगळ झालेली असते आणि वृक्ष निष्पर्ण झालेले असतात. त्यानंतर वसंत ऋतू नवीन पालवी घेऊन येतो. जन्ममृत्यूंच्या फेऱ्यात अडकलेला जीव अनेक जन्म फिरून मनुष्यजन्मात येतो !’’ या वेळी मनुष्यजन्म अत्यंत दुर्मिळ कसा आहे, हे त्यांनी मैत्रेय मुनींच्या जन्मकथेवरून सांगितले.
पुढे ‘माधवी’ याचा अर्थ ‘अमृताशक्ती’ म्हणजेच ‘श्रीसद्गुरुकृपा’ असा आहे, असे त्यांनी सांगितले. ‘‘जसा मनुष्यजन्म प्राप्त होणे कठीण तशीच सद्गुरुप्राप्ती होणे देखील अत्यंत कठीण आहे. कर्मसाम्यदशा आल्याखेरीज ही प्राप्ती होत नाही. मात्र कर्मसाम्यदशा ही सिद्धांसाठी वेगळी व साधकांसाठी वेगळी असते. आपल्याबाबतीत केवळ करुणेने सद्गुरूंनी कृपा केली आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे !’’
पुढे ओवीतील ‘नवपल्लवीं’, ‘पुष्प’ व ‘फळ’ यांचा अर्थ ‘विवेक’, ‘वैराग्य’ आणि ‘भगवत्प्रेम’ हे साधनेने येणारे पुढील टप्पे असा आहे, असे त्यांनी सांगितले.
‘‘विवेकाने विचार करून आचरण केल्यास हळूहळू विषयांमधून मन निघत जाते व तेथे वैराग्य प्रकटते. ही प्रक्रिया अचानक होत नाही, अगदी मनाच्याही नकळत होते. हे वैराग्य वाढावे म्हणून नित्य साधनेला सद्गुरुसेवेची तसेच सद्गुरुस्थानांच्या सेवेची जोड द्यावी. त्या स्थानी सद्गुरूंचे तपाचरण झालेले असल्याने तेथे नैसर्गिकदृष्ट्याच शुद्ध प्राण असतात. त्यांच्या सामर्थ्याने पापनाश होतो. या सर्वांची अंतिम फलप्राप्ती म्हणजेच आत्मसाक्षात्कार, ज्ञानप्राप्ती तसेच नित्य आनंदावस्था प्राप्त होणे हे आहे !’’
शेवटी साधक म्हणून महत्त्वाचे व चिंतन करण्याचे मुद्दे नमूद करताना प.पू. श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की, ‘‘मनुष्यजन्म हा केवळ परमार्थ साधण्यासाठीच आहे. ते न केल्यास मृत्यू देखील बरा. अत्यंत दुर्लभ अशी सद्गुरुप्राप्ती आपल्याला अनायासे झालेली आहे. साधकांच्या दृष्टीने भगवत्प्राप्ती हेच अंतिम ध्येय आहे. तरी त्याचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे साधना व सद्गुरुसेवा करावी. इतर कोणत्याही प्रलोभनांच्या मागे लागू नये !’’ ‘‘सर्व साधकांना सद्गुरूंकरवी मिळालेले साधन नित्य करण्याची बुद्धी त्यांनीच द्यावी,’’ अशी प्रार्थना करीत प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी आपली प्रवचन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
या अतिशय रसाळ आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बोधप्रद प्रवचन-सेवेनंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी ‘शंका-समाधाना’चे दुसरे सत्र संपन्न केले. ‘शरणागतभाव येण्यासाठी काय करावे ?’ या विषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘‘साधकाची शरणागती पराकोटीची असायला हवी. त्यासाठी त्याने दृढ निश्चयाची आणि स्वप्रयत्नांची जोड द्यायला हवी. शरणागत भाव हा श्रद्धा आणि प्रेमावर आधारित असतो. आपली श्रद्धा अधिक पक्की होण्यासाठी सद्गुरूंच्या व परंपरेच्या सामर्थ्यावर विश्वास हवा. त्यासाठी त्यांचे नित्य स्मरण व त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करावे. परंपरेतील महात्म्यांची चरित्रे वाचावीत. सद्गुरु जे सांगतील अथवा करतील त्यावर ठाम विश्वास असावा, त्यावर प्रश्न करू नयेत. संप्रदाय पांघरून राहावे. असे केल्याने हळूहळू शरणागतभाव येत जाईल. मात्र त्याबरोबर आपल्या श्रद्धेबद्दल अहंकारही बाळगू नये. नाही तर अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही !’’
‘त्यागपूर्वक भोग म्हणजे काय ?’ या शंकेचे निरसन करताना त्यांनी सांगितले की, ‘‘कोणत्याही भोगाचे तीन भाग; कर्तृत्व, भोक्तृत्व व फळ याबद्दल अलिप्तता ठेवून घेतलेला भोग म्हणजेच ‘त्यागपूर्वक भोग’ होय. असे केल्यास दुःखातही दुःख वाटणार नाही व सुखातही सुख होणार नाही !’’ भोग घेताना जर त्यात वासना अडकलेल्या असतील तर त्यात आपण कसे अडकतो व वासना नाहीशा झाल्यावर कसे मोकळे होतो, हे त्यांनी ओल्या व सुकलेल्या नारळाचे उदाहरण देऊन अतिशय सुंदर रीतीने स्पष्ट केले.
‘‘शेवटी मनुष्यजन्माचे कारण व मुख्य उद्देश लक्षात घेऊन आपण आपला परमार्थ करावा, इतरांच्या कर्माबद्दल विचार करीत वेळ व्यर्थ घालवू नये !’’ असे त्यांनी सांगितले.
‘शंका-समाधाना’च्या या अतिशय चिंतनप्रवण अशा सत्रानंतर ‘जयजय करुणामूर्ति दयाळा जयजय श्रीपादा । जयजय सद्गुरु अनाथनाथा जयजय श्रीपादा ॥’ हा नामजप, आरती-मंत्रपुष्प होऊन पुण्यकाल साजरा झाला. कऱ्हाड केंद्रातर्फे श्री. महेश बळवंत वाघमारे यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री. दादांचे प्रातिनिधिक पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमस्थळाचे; ‘श्रीसमर्थ मल्टिपर्पज हॉल’चे; मालक श्री.अजिंक्य पाटील, उत्सवात ध्वनिव्यवस्था-नियोजन करणारे श्री.विनायक कुंभार आणि कार्यक्रम पत्रिका व फ्लेक्स तयार करणारे श्री.नरेंद्र वळवडे यांना प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रसाद म्हणून देण्यात आले. तसेच भोजनव्यवस्था-नियोजन करणारे श्री.अजय महाराजा यांना पोशाख, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यानंतर सर्वांनी देवांच्या व श्रीसद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला. महाप्रसादानंतर या सर्वांगसुंदर सोहळ्याची सांगता झाली. दोन दिवस सुरू असलेला हा भक्तिरसपूर्ण महोत्सव श्रीसद्गुरूंच्या असीम कृपाशीर्वादांनी आणि उपस्थित सर्वांच्याच उत्स्फूर्त सहकार्याने अत्यंत आनंदाने व भक्तिभावाने संपन्न झाला. सद्गुरूंचे अम्लान श्रीचरण मनात स्मरून, त्यांना वारंवार वंदन करत सर्व साधकांनी एकमेकांचा प्रेमाने निरोप घेतला.
