‘प.पू.सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाग्रज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय’ या ग्रंथालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा वृत्तांत.


‘प.पू.सद्‌गुरु श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, पुणे’ आणि ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, आळंदी’ या दोन्ही ग्रंथालयांच्या संयुक्त विद्यमाने, आळंदी येथील ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनलया’च्या इमारतीमध्ये दोन्ही ग्रंथालयात सेवेसाठी येणाऱ्या साधक बंधू भगिनींसाठी शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत, चिपळूणचे श्री. धनंजय चितळे यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आळंदी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. जयंत साठे यांच्या हस्ते श्री. धनंजय चितळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

‘भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. (शियाली रामामृत) रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु जास्तीत जास्त साधक बंधु भगिनींना या कार्यशाळेचा लाभ घेता यावा या करिता १० ऑगस्ट रोजी हा ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येत आहे’ असे सौ. ज्योत्स्ना घाटपांडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केले.

श्री. धनंजय चितळे यांनी श्री. रंगनाथन यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, नोकरी, लंडनमधील ग्रंथालय शास्त्राचं शिक्षण, ग्रंथपाल आणि त्यांचे ग्रंथालय चळवळीतील योगदान असा त्यांचा जीवन प्रवास कथन केला.

श्री. चितळे यांनी ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या तिघांचं एकत्रिकरण म्हणजे ग्रंथालय असे सांगून ग्रंथसेवक कार्यतत्पर, अभ्यासू व कर्तव्यतत्पर असावा असे सांगितले. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, वाचकांपर्यंत ग्रंथ पोहोचले पाहिजेत, प्रत्येक पुस्तक हे वाचकांसाठी असते, वाचकांचा आणि ग्रंथपालाचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे ही ग्रंथालयशास्त्राची डॉ. रंगनाथन यांनी दिलेली ५ सूत्रे विस्ताराने सांगताना ग्रंथांची निवड कशी करावी, ग्रंथपालाची, ग्रंथसेवकाची जबाबदारी, त्यांचा दृष्टीकोन, ग्रंथांची देवघेव करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रंथांची नोंदणी आणि त्यांचे वर्गीकरण नेमके कसे करावे, दुर्मिळ ग्रंथ व संदर्भ ग्रंथांचे नेमकं काय महत्व आहे यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मोलाचं मार्गदर्शन अगदी हसत खेळत आणि अनेक गमतीदार उदाहरणं देऊन केलं. उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना श्री. चितळे यांनी अतिशय समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योत्स्ना घाटपांडे यांनी केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. जयंत साठे यांच्या हस्ते श्री. धनंजय चितळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

कार्यक्रमातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider